लॉकडाऊनच्या पत्रकारी नोंदी - शेखर देशमुख

 


कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात जसं आत्ममग्न समाजाचं दर्शन घडलंतसंच बेवारस कामगार वर्गाचं बेदखल जगणंही जगापुढे आलं. या दोन टोकाच्या अवस्थांमध्ये पुढे सरकत गेलेल्या समाजाने काय साधलंकाय गमावलंयाचं भान देणारं ‘जग थांबतं तेव्हा..’ हे गौरी कानेटकर यांचं पुस्तक नुकतंच ‘समकालीन प्रकाशना’तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तक-प्रयत्नाबद्दल..

माणसांच्या संवेदनांचा परीघ कोण ठरवतं? किंवा तो कसा ठरतो? संवेदनशीलतेच्या व्याप्ती आणि खोलीवर कुणाचं नियंत्रण असतं? काळ कोणताही असो, हे प्रश्न अनन्यसाधारण महत्वाचे ठरतात. जीवघेण्या कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्याच्या एका दृश्य हेतूने भारतात लागू झालेल्या लॉकडाऊन काळात तर या प्रश्नांनी सुबुद्धांचा पिच्छा सोडणं तसंही अपेक्षित नाही. कारण स्पष्ट आहे. या काळात माणसामधली माणुसकी जितकी उजळून निघाली, त्याहून अधिक माणसामाणसांतल्या विकार-विकृतींचं आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या अधिकारशाही प्रवृत्तीचं खुलेआम दर्शन घडत गेलं.

खरं पाहता, कोरोनामुळे नव्हे तर कोरोना संसर्गाशी लढण्यास देशाची आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने लादण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे माना मोडून झुंडीत शिरणार्‍यांपासून ते या झुंडींचे उघड-छुपं नेतृत्व करणार्‍या नेते-धोरणकर्त्यांची भेदमूलक मानसिकता उघड झाली. म्हणजे, या काळात सुस्थापितांमधल्या एका वर्गाने आयुष्यभरात न जमलेल्या ‘क्रिएटिव्हीटी’चं जमेल त्या माध्यमांतून प्रदर्शन मांडले. तर दुसर्‍या, अर्थात नाकारल्या गेलेल्या कष्टकरी वर्गाने आयुष्यभराची फरफट सोसली. कुत्र्याच्या मौतीचे जीणे अनुभवले. या सगळ्या त्रासभोगात, देश लवकरात लवकर आरोग्यविषयक संकटातून सावरावा याहीपेक्षा नेते-धोरणकर्त्यांमध्ये राजकीय डावपेच अधिक उत्साहाने खेळले गेले. हातात असलेली सत्ता अधिकाधिक मजबूत, कडेकोट होण्यासाठी एकमागोमाग आदेश-प्रतिआदेश जारी करून कठोरातले कठोर कायदे-नियम जनतेवर लादले गेले. जनतेच्या मन-मेंदूवर सर्वंकष ताबा मिळवण्याच्या हेतूने लोकशाही नीतिमूल्यं सर्रास पायदळी तुडवली गेली. विचारशक्ती नि विवेकबुद्धी हरवलेल्या झुंडींची सहमती आहे, हे ठाऊक असल्यानेच बहुदा ‘सुपरस्प्रेडर’ असे दूषण देऊन विशिष्ट समुदायांना सरकारच्या पातळीवर अगदी स्पष्टपणे सांगायचं तर आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन वार्तालापातदेखील लक्ष्य केलं गेलं. यावर आक्षेप घेऊन सरकारला जाब विचारण्याऐवजी, हा खोटा सिद्धांत घराघरांत मीडिया-सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवला गेला. याच रोबोटिक होत गेलेल्या समाजाच्या भविष्याचं सूचन असलेल्या लॉकडाऊन काळातल्या मनो-भावनिक अवस्था समकालीन प्रकाशनाच्या गौरी कानेटकरलिखित ‘जग थांबतं तेव्हा...लॉकडाऊन काळातल्या नोंदी’ या पुस्तकात अत्यंत तपशीलवार नोंदवण्यात आल्या आहेत.

कोरोनाचं संकट उंबरठ्यावर आलं, तसा मार्च महिन्यातल्या एका रात्रीत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला. या अकस्मात बसलेल्या धक्क्यातून सावरायला काही तास, काही दिवस गेले खरे, पण त्यानंतर जे घडताना दिसलं, ते अधिक धक्कादायक ठरत गेलं. सुस्थापित, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय जनता आपापल्या घरादारांत सुरक्षितता अनुभवती झाली आणि हातावर पोट असणारे कामगार-मजूर रस्त्यांवर-महामार्गांवर मरणयातना सहन करत राहिले. किंबहुना, हा विरोधाभास, ही विसंगती सबंध लॉकडाऊन काळाचं व्यवच्छेदक लक्षण होऊन सोबत करत राहिली. यात एका बाजूला दरदिवशी संसर्गग्रस्तांची उलटसुलट आकडेवारी, सरकारी आदेशांचा डोकं चक्रावून टाकणारा अखंड मारा, त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली ठिकठिकाणच्या पोलीस यंत्रणेने राबवलेली दंडुकेशाही, शेकडो-हजारो मैलांचा लाखो स्थलांतरितांचा झालेला कमालीचा वेदनादायी प्रवास, या प्रवासादरम्यान स्थलांतरितांचे घडून आलेले दुर्दैवी मृत्यू, आरोग्य यंत्रणेतली अनागोंदी, साधनसामग्री खरेदीतला भ्रष्टाचार, रुग्ण आणि त्यांच्या दिशाहीन नातेवाईकांचे आक्रोश, बळेबळेच सकारात्मकतेची झूल पांघरून सारं काही आलबेल असल्याचा आभास निर्माण करणारी सत्ताधारी यंत्रणा, कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची सततची वाढती संख्या आणि दुसर्‍या बाजूला, ‘केक’ बनवायचा की ‘प्लम केक’, आज ‘चिकनी चमेली’वर डान्स करायचा की, ‘साकी साकी’ वर या वंचनेत असलेला सुखासीन वर्ग.

एका बाजूला, कोरोनामुळे पाच-पन्नास लाख मेले, तर तेवढाच देशावरचा भार हलका होईल, असं म्हणत सोशल मीडियावर लाइक मिळवणारे टाळी नि थाळीबाज महाभाग, तर दुसरीकडे अख्खा कष्टकरी वर्ग संकटात असताना ‘वंदे भारत मिशन’, ‘श्रमिक एक्स्प्रेस’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ अशा उत्सवी घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेणारं देशाचं कोडगं सरकार. या आणि अशा अनेक विसंगतींची नोंद घेत ही डायरी पहिल्या पानापासून आकार घेत जाते. स्वतःमध्ये न रमता, आसपासच्या जगातल्या घडामोडी डोळसपणे टिपत राहते. टोकदार निरीक्षणं, उद्वेग, हतबलता, अस्वस्थता, प्रसंगी समाधान आणि सहवेदना शब्दांतून व्यक्त करत जाते.

त्या अर्थाने, स्वतःपलीकडच्या, नजर जाईल तिथवरच्या जगाबद्दल, त्या जगातल्या व्यापातापाबद्दल लेखिका या डायरीच्या माध्यमातून प्राधान्याने अभिव्यक्त होत जाते. वैयक्तिक तपशील नावापुरतेच डोकावतात. यातलं एखादं निरीक्षण (उदा. ‘लोक चांगलेचुंगले कपडे घालून, बायका दागदागिने घालून गॅलर्‍यांमध्ये जमलेत आणि जोरजोरात टाळ्या-थाळ्या बडवताहेत. लोकांनी आपापल्या डीपीवर ते फोटो टाकलेत. फेसबुकवर फोटो पडताहेत. जणू आज पाच वाजता टाळ्या वाजवणं हे मतदान करण्यासारखं काहीतरी कर्तव्य असावं’), एखादी कॉमेंट (उदा. ‘कोरोनाच्या निमित्ताने आपल्याकडे आणीबाणीची ट्रायल रनच सुरू आहे की काय? निमित्त खोटं नाही, पण सत्ताधार्‍यांच्या दृष्टीने फायदे मात्र कोरोना नियंत्रणापलीकडचे आहेत’), एखादा उपरोधिक टोला (उदा. आज सकाळी पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार कळल्यावरच मनात म्हटलं, हे पुन्हा सत्संग ऐकवणार बहुतेक) समाजाच्या मनोवस्थेचं वर्णन करण्यास पुरेसा ठरतो. यात जसं लॉकडाऊन काळातल्या सामाजिक-राजकीय बदलांचं सूचन येतं, तसं देश पातळीवर झुंडशाहीला आकार देणारं विघातक रचनाशास्त्रही उलगडत जातं. यातून लेखिकेच्या संवेदनशीलतेचं दर्शन घडतंच, पण व्यवस्थेने डकवलेली उत्सवी झालर बाजूला सारून आसपासच्या घटना-प्रसंगांकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याची लेखिकेची क्षमताही आकळते. यातूनच पुढे जाऊन कुटुंब, समाज, देश अशा स्तरांवर नागरिकांच्या बदलत्या नात्यांचे अर्थ नव्या परिप्रेक्ष्यात ताडून पाहण्याची गरजही अधोरेखित होते.

‘बरंच झालंलॉकडाऊन लागू केला. या निमित्ताने लोकांना शिस्त तरी येईल’ अशी भाबडी आशा अनेकांनी या काळात बोलून दाखवली. पण, जातीजातींमध्ये दुजाभाव राखण्यातून आपल्याकडे सर्व स्तरांत सूक्ष्म पातळीवर सूडप्रवृत्ती पेटती राहिली, त्याचीच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून शिस्तभंगाला, भ्रष्ट वर्तणुकीला उद्युक्त करणारी गुणसूत्रं सक्रीय होऊन प्रत्येक नव्या पिढीत संक्रमित होत गेली, हे या भाबड्यांना कधी लक्षात आलं नाही. लॉकडाऊन काळातल्या शिस्तभंगाच्या, भ्रष्ट वागणुकीच्या अनेक कहाण्यांनी या सनातन सत्यास दुजोरा दिल्याचं दिसलं, त्याचेही दाखले पुरेशाने या नोंदीत आले आहेत.

एरवी, सत्य हे खर्‍या आणि खोट्याच्या मध्ये अधांतरी तरंगत असतं. त्या, नजरेतून सुटून जाणार्‍या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या नोंदी मोलाची भूमिका बजावतात.

कोणे एकेकाळी डायरी लिहिणं, हा आत्मसंवाद आणि आत्मचिकित्सेसाठीचा महत्वाचा संस्कार मानला जाई. काळाच्या ओघात जगण्यातला ठहराव संपला, यंत्रमानवीकरण वेगाने घडत गेलं, तशी डायर्‍यांची पानं कोरी राहात गेली. तो कोरेपणा घालवत एक समाज म्हणून आत्मभान जागवण्याचा प्रयत्न लेखिकेने या नोंदींच्या माध्यमातून केलेला आहे. या डायरीतल्या नोंदी एका पातळीवर काळाचं गांभीर्य राखत आत्मचिंतनात्मक, आत्मटीकात्मक असल्या तरी लेखिकेला लॉकडाऊन काळातल्या, सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या चुटकुल्यांचं, आसपास घडलेल्या प्रासंगिक विनोदांचं नि उपरोधाचं वावडं नाही, याचेही मासले (उदा. आजचा जोक ऑफ द डे- आज सकाळी बाल्कनीत चड्डी वाळत घालत होतो. शेजारच्या काकू डोकावून बघत, घाबरलेल्या आवाजात पण भक्तिभावाने म्हणाल्या, आज बाल्कनीत चड्ड्या वाळत घालायला सांगितलं होतं का? किती वाजता?) डायरीत जागोजागी आढळतात. काही ठिकाणी नमूद केलेले निरीक्षणवजा प्रश्न वाचकांच्या मनात उपप्रश्न उपस्थित करतात नि संभाव्य उत्तरापर्यंतही पोहोचवतात. (उदा. ‘आपण घरी अडकून पडलो आहोत, लोक बाहेर नाडले जातायत, आणि आपण काही करू शकत नाही, आपल्याला कसलाच ‘से’ नाही, अधिकार नाही, आपण कःपदार्थ आहोत, याची जाणीव माणसाच्या मनावर काहीतरी परिणाम करत असणार’ हा लेखिकेचा प्रश्न वयोमानाच्या अकस्मात वेगवान होण्याच्या संभाव्य प्रक्रियेकडे (रॅपिड एजिंग प्रोसेस) आपलं लक्ष वेधून घेतो.) एकंदरीतच, गौरी कानेटकर या पत्रकार-लेखिका आहेत. पण त्याहीपेक्षा त्या संवेदनांचा परीघ मोठा असलेल्या सजग नागरिक प्रथम आहेत, याचं प्रतिबिंब डायरीच्या प्रत्येक पानावर उमटत राहतं.

१८ मार्च ते ३१ जुलै या जवळपास साडेतीन महिन्यांचा पट उलगडणार्‍या या पुस्तकाला असलेली डॉ. सुहास पळशीकरांची प्रस्तावना, समाजाच्या वर्तनाची चिकित्सा करत, कोरोना संसर्गाच्या काळात, त्यातही लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरच्या काळात आपण काय कमावलं आणि काय गमावलं, याविषयीचं अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्या पुढ्यात ठेवते. आपण ज्याला मध्यमवर्ग म्हणून संबोधत होतो, तो आता ‘माध्यमवर्ग’ झालेला आहे. या माध्यमवर्गालाच डोळ्यांपुढे ठेवून लॉकडाऊनचं कथानक रचलं गेलं आहे, हे त्यांचं म्हणणं आपल्याला क्षणभर थबकवतं. लेखिकेचे शब्द आणि अन्वर हुसेन यांची मुखपृष्ठापासून नजरेत भरणारी परस्परपूरक (खरंतर परस्परसंवादी) चित्रं पुस्तकाचं संग्राह्य मूल्य वाढवतात. किंबहुना, अनेकदा असंही घडतं की, गौरी कानेटकरांचे शब्द अस्वस्थ करणारं चित्र डोळ्यांपुढे उभं करतात, तर हुसेन यांची अर्थवाही चित्रं डोक्यातलं विचारांचं चक्र गतिमान करत जातात. त्या चित्रांमधली लॉकडाऊनमुळे जेरबंद झाल्याने जागीच थिजून गेलेल्या असहाय्य माणसाच्या मेंदूचा भुगा करून परतीच्या वाटेवर असलेली मुंग्यांची रांग, चहुबाजूंनी प्रचंड दाबाच्या प्रेशर कूकरचा भास करून देणार्‍या खुराड्यामध्ये दाटीवाटीने कशीबशी तग धरून असलेली कोंडमाराग्रस्त माणसं, अपघातानंतर रेल्वेरुळांवर इतस्ततः विखुरलेल्या भाकर्‍या आणि गतप्राण झालेल्या मजुरांची कलेवरं, डोळ्यांत शून्य भाव, देहबोलीत अगतिकता आणि तोंडावर मास्क असा जिवंतपणी जखडलेपण आलेला एकेकटा इसम इत्यादी प्रतिमा वाचक म्हणून आपलं मन सुन्न करतात. पुस्तकाचा आशय-विषय आणि शब्द-चित्र यांच्यात साधलेला मेळ वाचकाला कोरोना काळातला आत्मपरीक्षणाचा एक उद्देश सफल झाल्याचं समाधान देतो, आणि सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आधुनिक भारताच्या इतिहासात राबवल्या गेलेल्या प्रदीर्घकालीन व्यवहारबंदीने समाजाचं चित्र आणि चारित्र्य आमूलाग्र बदलून टाकलं असल्याची नेमकी जाणीवही पेरतो. म्हणूनच समाजशास्त्राच्या अंगाने उपयुक्त संदर्भ ऐवज असलेल्या या डायरीरूपी पुस्तकाचं महत्व कायमस्वरूपी मनावर ठसत राहतं.

शेखर देशमुख

९८१९६९६६७६

deshmukhshekhar101@gmail.com

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

दोस्त गुरुजी - अनिल अवचट : सुहास कुलकर्णी