अफगाणिस्तानचा सय्यद गलाह : डॉ. शंतनू अभ्यंकर

                                                            अनुभव सप्टेंबर २०२१

रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तानातला एक मुलगा पुण्यात शिकायला येतो, तेव्हा काय घडतं? अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिथल्या माणसांची झलक दाखवणारा खुमासदार लेख.


कोण कुठला सय्यद गलाह, अचानक माझ्याच वर्गात माझ्याच बॅचला दाखल होतो काय आणि चांगला मित्र बनतो काय, सारंच जरा वेगळं घडलं.

 ...आणि आता रोज बातम्या येतात युद्धाच्या, निर्वासितांच्या, छळ छावण्यांच्या, क्रांतीच्या आणि प्रतिक्रांतीच्या. रोज टी.व्ही.वर चित्रं झळकतात, वर्तमानपत्रांत मोठे मोठे फोटो येतात; युद्धात मेलेल्यांचे, मारणार्यांचे, मरायला टेकलेल्यांचे, मरायला तयार असणार्यांचे. आणि मारण्यासाठी लायनीत उभे केलेले जीव सगळे. ते सर्व पाहून रोजच मला सय्यदची आठवण येते. तो वगळता त्याच्या कुटुंबीयांना मी भेटलेलो नाही, पण तरीही युद्धपीडित माणूस, कुटुंब, देश वगैरे म्हटलं की मला आपोआप सय्यद, त्याचं कुटुंब आणि देश आठवतो.

तो अफगाणिस्तानचा. मेडिकल कॉलेजला पहिल्या वर्षाला माझ्या वर्गात आला. त्याला हिंदी, इंग्रजीचा गंध नव्हता. त्याची अॅडमिशनच मुळी एक आंतरराष्ट्रीय मामला होता. त्याचे वडील दिल्लीत अफगाण वकिलातीमध्ये कोणी बडे अधिकारी होते. अफगाण कम्युनिस्ट पक्षाचे ते एक मोठे नेते होते म्हणे. सय्यदही शाळेत असतानाच रशियात गेला होता... शाळेसाठी, लष्करी प्रशिक्षणासाठी आणि कम्युनिस्ट होण्यासाठी. त्याला बंदुका, बॉम्ब वगैरे हाताळण्याचं तंत्र अवगत होतं. रशियन आणि पुश्तू भाषा अवगत होत्या. वडलांची दिल्लीत बदली झाल्यावर तो दिल्लीत आला. रशियाने अफगाणिस्तानात नुकतंच सैन्य घुसवलं होतं, तिथल्या जनतेच्या मनाविरुद्ध. ‘क्रांतीच झाली अफगाणिस्तानात, त्याला आमचा काय इलाज?’ असा रशियाचा सवाल; आणिअसल्या छप्पन क्रांत्या बघितल्याहेत. असल्या क्रांत्यांचं नेमकं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे’, ही अमेरिकेची गुर्मी. पण रशियाच्या आंतरराष्ट्रीय दादागिरीपुढेब्रकाढायची भारताची हिम्मत नव्हती. उलट, अफगाण सरकारला मान्यता, तिथल्या सर्व संस्थात्मक ढाच्याला आधार आणि त्यातून परस्पर पाकिस्तानला शह, असंच भारताचं धोरण होतं. यातूनच भारतातल्या अफगाणी अधिकार्यांच्या सर्व गरजांची काळजी घेणं ओघानेच आलं. मग त्यात त्यांच्या मुलांची, मुलांच्या शिक्षणाचीही काळजी आली. आणि येणेप्रमाणे सय्यद माझ्या वर्गात दाखल झाला होता. पुण्याला कॉलेजला जायचं म्हटल्यावर त्याने दिल्लीत दोन महिन्यांसाठी इंग्रजीचा क्लास लावला होता.

पहिल्याच दिवशी कॉलेज संपल्यावर मला म्हणाला, “रूमवर सोड.”

कुठे आहे रूम?”

त्याने चक्क स्टेशनजवळच्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलचंच नाव घेतलं. मी उडालोच. जिथल्या लाल रुजाम्यावर चालण्याकरता आमचे पाय आसुसले होते, जिथल्या दारवानाच्या कुर्रेबाज मिश्यांच्या मिजाशीपुढे आम्ही चाचरायचो, अशा त्या हॉटेलात हा गेले पंधरा दिवस राहत होता. कॉलेज सुरू होईपर्यंत म्हणून ही व्यवस्था होती. तो लवकरच होस्टेलवर दाखल होणार होता.

तसा तो चार दिवसांतच होस्टेलवर आला. कुठे ते हॉटेल आणि कुठे आमचं होस्टेल! पण सय्यदने थोडीसुद्धा नाराजी दाखवली नाही. अगदी सहजपणे तो होस्टेलच्या कुशीत शिरला. गैरसोयी आणि ढेकणांना पुरून उरला. त्याची ही सहनशक्ती अजबच म्हणायची.

त्याची रूम होती ई-ब्लॉकवर, सर्वांत वरच्या मजल्यावर; पण तो माझ्याच रूमवर पडीक असायचा. सक्काळी जॉगिंग, मग डी-ब्लॉकसमोर चहा; मग लेक्चर, क्लिनिक, डबा, लेक्चर; संध्याकाळी व्हॉलिबॉल, फुटबॉल; रात्री डबा, जर्नल कम्प्लीशन, जनरल टवाळक्या....आणि मग रनिंग रेस. रोज रात्री होस्टेलसमोरच्या रिकाम्या गल्लीत पळण्याची शर्यत व्हायची. रोज सय्यद जिंकायचा, रोज रात्री रबडी पाजायचा आणि झोपायला तेवढा रूमवर जायचा. त्या रबडीइतकंच आमचं गाढ मैत्र जुळलं हळूहळू.

एकदा सहज त्याचं बँकेचं पासबुक त्याने दाखवलं. त्यातली रक्कम बघून माझे डोळेच फिरले. ‘एवढी मोठी रक्कम तू सेव्हिंग खात्यात कशाला ठेवलीस?’ असं विचारताच वडलांनी पुढील पाच वर्षांची तरतूद म्हणून हे पैसे पाठवल्याचं त्याने सांगितलं. मग आम्हीच दोघांनी बँकेच्या मॅनेजरना भेटून एफ.डी. वगैरे केल्या. एवढ्या मोठ्या रकमेची एफ.डी. बसल्या जागी मिळतेय हे पाहून त्या मॅनेजरना कृतकृत्य होत होतं. पण आमचं वय, आमची ष्टोरी आणि रक्कम यांचा मेळ बसेना. काबूल, दिल्ली, कॉलेज, पुणे, सय्यद, नोज नॉट इंग्लिश...असं ते बराच वेळ पुटपुटत राहिले. त्यांना भलत्या भलत्या शंका यायला लागल्या. तेवढ्यात सय्यदने त्याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट पुढे केला. आधी त्या मॅनेजरना त्यात काही गम्य दिसलं नाही; पण आतल्या केबिनमधून त्यांनी कुणाला तरी फोन लावला आणि त्यांना त्या पासपोर्टचं महत्त्व उमगलं. तत्काळ किती आणि कशी मदत करू असं झालं त्यांना. त्यांनी चहा-बिस्किटं मागवली आणि पुढे एफ.डी.च्या पावत्या द्यायला जातीने रूमवर आले साहेब. रूमची आणि त्यातील सय्यदची अवस्था पाहून त्यांना आमच्याबद्दल पुन्हा शंका आली असणार.

कॉलेज सुरू झालं तेव्हा रशियाने अफगाणिस्तानातून आपल्या फौजा काढून घ्यायला नुकतीच सुरुवात केली होती. हा टेकू जाताच तिथलं नजीबचं सरकार अस्थिर झालं होतं. प्रचंड यादवी माजली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. चिनी आणि अमेरिकन समर्थन असलेल्या मसूदच्या फौजा, पाकिस्तानचा कळसूत्री बाहुला हेकमत्यार आणि अरबी आधाराने लढणारा हक्कानी हे सगळे नजीब सरकारविरुद्ध लढत होते. मधूनच वेळ मिळाला की आपापसातही लढत होते. ‘टाइम्सकिंवाएक्स्प्रेसमध्ये काय कॉलमभर त्रोटक बातमी येईल त्यावरून हे सगळं समजायचं. सय्यद आसुसलेला असायचा, मायदेशीच्या बातम्यांसाठी. पण मार्ग कोणताच नव्हता. मग एके दिवशी त्याला मी ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीत घेऊन गेलो. तिथल्या आंतरराष्ट्रीय पेपरांत इथल्यापेक्षा जरा जास्त माहिती यायची. पण ते पेपर ब्रिटिशधार्जिणे होते आणि त्यातल्या बातम्या बंडखोरांच्या बाजूने असायच्या. राष्ट्राध्यक्ष नजीब यांचा उल्लेखच मुळीनामधारी अध्यक्षअसा असायचा. पुढे पुढे नजीब सरकारचा पाडाव स्पष्ट दिसायला लागला. ‘क्रूर’, ‘नादान’, ‘रशियाच्या ओंजळीने पाणी पिणार्यासरकारचा धिक्कार पानोपानी दिसायला लागला. बातम्याही त्रासदायक आणि त्यातली भाषाही क्लेशदायी. मग ब्रिटिश कौन्सिलच्या भेटी बंदच झाल्या हळूहळू. आता टी.व्ही.वरचा प्रणव रॉयचाद वर्ल्ड धिस वीकहा कार्यक्रमच उरला फक्त. अफगाणिस्तानात काही भलं घडतच नव्हतं. दर आठवड्याला बुरं तेवढं ऐकून खालमानेने सय्यद रूमवर परतायचा. पण नजीब तसा चिवट. जाता जाता रशियाने त्याला शस्त्रास्त्रांचा भरपूर प्रसाद दिलेला. त्या जोरावर ते सरकार तगून होतं.

फर्स्ट इयरची परीक्षा जवळ येत होती. तिकडे जलालाबादेत धुमश्चक्री पेटलेली होती. बंडखोरांनी सर्व शक्तीनिशी हल्ला केलेला होता. सय्यद विदीर्ण होत होता.

मी नापास झालो तर रे? तरीदेखील मैत्री राहील नं आपली?” परीक्षेआधी त्याचा मला प्रश्न. त्याच्या चेहर्यावर प्रचंड काळजीची काजळी.

अर्थात!” माझं बेसावध उत्तर.

अरेच्या! मला वाटलं, तू म्हणशील, सय्यद, तू नापास कसा होशील? तू पासच होशील!”

तो नापास होणार नाही असा आश्वासक सूर हवा होता त्याला; पण तो पास होणं शक्यच नव्हतं. पहिलं एक वर्ष तर इंग्लिश शिकण्यातच गेलं होतं. नुकतंच कुठे त्याला बर्यापैकी इंग्लिश जमायला लागलं होतं. आता येत्या सहा महिन्यांत परीक्षा. दीड वर्षाचा सगळा अभ्यासक्रम नेमलेला. सहा महिन्यांत जुजबी इंग्लिशच्या जोरावर दीड वर्षाचा अभ्यासक्रम वाचणं, आत्मसात करणं आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाणं हे अशक्यच होतं. पण सय्यदला मात्र माझ्याकडून आश्वासक प्रतिसाद हवा होता. तो त्याचा हक्क आणि माझी जबाबदारी होती. मी कुठून देणार होतो त्याला विश्वास? इथे भल्याभल्यांची फाटली होती; पण माझ्या उत्तराने तो खूप दुखावला गेला. मात्र, जलालाबादची लढाई नजीबने आश्चर्यकारकरीत्या जिंकली आणि सय्यद सुखावला. त्या उन्मादात त्याने मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा दिली; पण तरी तो फर्स्ट इयरला लटकला.

पहिल्या वर्षी नापास झालेल्या मुलांना सहा महिन्यांनी पुन्हा परीक्षा देता येते. ती पास झाल्यावरच त्यांचं दुसरं वर्ष सुरू होतं. या बॅचलाऑड बॅचम्हणतात. एकदा तुम्ही ऑड बॅचला गेलात की तुमच्या बरोबरच्या मित्रांची संगत आपोआप सुटते. कारण वर्ग, प्रॅक्टिकल, क्लिनिक, परीक्षा या सगळ्यांचं वेळापत्रक कधीच जुळत नाही. भेटीगाठी, एकत्र खेळ, अभ्यास, दंगा हेही मग कमी कमी होत जातं. शिवाय रेग्युलर बॅचचा अहंगंड आणि ऑड बॅचचा न्यूनगंड कमी-अधिक प्रमाणात उरलीसुरली मैत्री संपुष्टात आणतो. सय्यद अपेक्षेप्रमाणे ऑड बॅचला गेला; पण तरीही आमची मैत्री मात्र विरली नाही.

फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला त्याच दिवशी जर्मनीची ती कुप्रसिद्ध भिंत छिन्न छिन्न झाली. सय्यदची मोठी बहीण पूर्व जर्मनीत होती. तिचा नवरा अहमद तिथल्या अफगाण वकिलातीत कोणी अधिकारी होता. तिचे आणि तिच्या चार गोंडस मुलांचे फोटो तो अधूनमधून दाखवत असे. त्याची बहीण अगदीच बुरख्यात नाही, पण तोंडावर रुमाल वगैरे बांधून. सय्यद सांगत होता, आता बहिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना जर्मनीत राहणं अशक्य आहे. तिथे जर्मन कम्युनिस्ट स्वीकारार्ह होते, पण बाहेरचे कम्युनिस्ट अजिबात नाही.

झालंच तसं. महिन्याभरात सय्यद भरल्या डोळ्यांनी रूमवर आला. ती भिंत पाडायला पूर्व जर्मनीतल्या कट्टर कम्युनिस्टांचा विरोध होता. अशाच एका गटाच्या गुप्त सभेसाठी अहमद गेला होता. तिथे विरोधी गटाचे लोक आले. बोलाचाली झाली. प्रकरण हमरीतुमरीवर आलं. या भडक माथ्याच्या अफगाणाने खिशातून पिस्तुल काढलं. झटापटीत ते दुसर्याच कुणी तरी हिसकावलं आणि पहिल्याच गोळीत याला टिपलं. पुढे पूर्व आणि पश्चिम जर्मनीचं एकत्रीकरण झालं. सय्यदची बहीण आणि तिची मुलं जर्मनी सोडून पोलंडमार्गे फ्रान्समध्ये आश्रयाला गेली बहुतेक, पण नेमकं काहीच कळत नव्हतं.

पुढे अफगाणिस्तानात युद्धाचा भडका उडाला. तिथे तालिबानचं राज्य आलं. नजीबला गाडीमागे बांधून रस्त्यात फरफटत नेत ठार मारण्यात आलं. त्याच्या मृतदेहाचे धिंडवडे निघाले. नजीबला भर रस्त्यात फाशी दिल्याची बातमी आली आणि सय्यद विस्फारित नेत्रांनी बातम्यांतले फोटो पाहत राहिला. त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. नजीब त्याच्या वडलांचा दोस्त. लहानपणी तो नजीबच्या हवेलीवर खेळायला जायचा. नजीबचा पुतण्या त्याचा खास दोस्त.

अफगाणिस्तानात रक्तरंजित क्रांती झाली.

मूलतत्त्ववाद्यांचं सरकार आलं. नव्या सरकारचं आणि भारत सरकारचं सूत जुळेना. जुन्या सरकारचे कारभारी काही दिवस दिल्लीच्या आश्रयाला राहिले; पण त्यांनाही पुढे देश सोडावाच लागला. सय्यदचे आई-वडील असेच तडकाफडकी दिल्ली सोडून गेले. जाण्यापूर्वी त्याला भेटूही शकले नाहीत. बरेच दिवस ते कुठे आहेत वगैरे काहीच कळेना. फोन, पत्रं काहीच नाही. मायभूमीची वाताहत. सतत युद्ध. आई-बाप गायब, विधवा बहीण नेमकी कुठे त्याचा काही पत्ता नाही; आणि हा इथे पुण्यात, इंग्रजी आणि मेडिकलच्या अभ्यासक्रमाशी झगडतोय. पण तो भलताच चिवट आणि खंबीर होता. या असाधारण परिस्थितीबद्दल चकार शब्द कधी काढायचा नाही. मी विचारलं तर चार-दोन शब्दांची त्रोटक उत्तरं यायची. शेवटी मी नाद सोडून दिला. 

एकदा सिनेमाला गेलो- मीरा नायरचासलाम बॉम्बे’. अंगावर येणारा सिनेमा. घरातून परागंदा झालेलं ते पोरगं... त्याचं नाव हरवतं, गाव हरवतं. मुंबईत त्याचा जगण्याचा झगडा सुरू होतो. ते पोरगं चहाच्या गाड्यावर हरकाम्या म्हणून कामाला लागतं. ‘ए च्या-पावहेच त्याचं नाव बनतं. एकदा पोस्ट ऑफिस पाहून त्याला घरी पत्र लिहायची उबळ येते. लेखनिकासमोर बसून तो मोठ्या उमेदीने मजकूर तर सांगतो, पण त्याला पत्ता माहिती नसतो. पत्ता म्हणून नुसतंरामपूरसांगितल्यावर लेखनिक वैतागतो. ‘पत्ता माहीत नाही तर पत्र लिहून टायम बरबाद का केला माझा?’ म्हणून खेकसतो. लेखनिक पुन्हा पुन्हा विचारत राहतो. हा हिरमुसत, मुसमुसत, विझत विझत जातो. शेवटी वैतागून लेखनिक त्या पत्राचा बोळा करून फेकून देतो. कॅमेरा त्या घरंगळणार्या कागदी बोळ्यावर स्थिरावतो आणि या प्रचंड मानवसमूहातल्या बेपत्ता माणसांचं एकलेपण आपल्यावर भिरकावून देतो...

हे सगळं बघताना शेजारी बसलेला सय्यद अगदी आतून हलल्याचं मलासुद्धा जाणवलं. त्याला सहनच होईना. दु:खाचे कढ शेवटी बांध फोडून बाहेर आले. तो गदगदून रडायला लागला. त्याला कसाबसा सावरत, सांभाळत मी होस्टेलला आणला. पुढे चार दिवस तो घुमा होता. एका शब्दाने बोलेना. चौथ्या दिवशी मला म्हणाला, “चार दिवस झोपलो नाहीये मी. झोपूच शकलेलो नाही.” मला काय बोलावं हेच सुचेना. पण या भळभळत्या दुःखावर शर्तीली दवा त्याची त्यानेच शोधून काढली होती. त्या दिवशी त्याने तो सिनेमा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पाहिला. थेटरच्या अंधारात मनसोक्त, मनमोकळं रडला तो. काळजातल्या दुःखाचा सगळा गाळ एकदाचा उपसला गेला आणि मग तो शांत शांत झाला.

सुट्टीत सय्यदला कधीही कोणीही घरचं भेटायला आलं नाही की हा कधी सुट्टीत घरी गेला नाही. घर होतंच कुठे? उद्ध्वस्त आणि अस्वस्थ अफगाणिस्तानमधून सारेच पांगलेले, परागंदा झालेले. आलाच तर तो माझ्याच गावी यायचा. मनसोक्त राहायचा. निघताना होस्टेलच्या रखवालदाराला, आपल्या खर्जातल्या कर्कश आवाजात, फर्ड्या मराठीत सांगायचा, “गाव्वी ज्वावून यतो!” गावातल्या ब्लड बँकेत आवर्जून रक्तदान करायचा. (केल्यावर न चुकता चक्कर येऊन पडायचा!) गमतीने म्हणायचा, “तुझा अल्सेशियन भॉव भॉव असं ओरडत नसूनगलाः गलाःअशी मलाच हाक मारतोय!” एकदा बॅडमिंटनच्या

स्पर्धेचं उद्घाटन त्याच्या हस्ते केलं, तर पठ्ठ्याने स्पर्धेत भाग घेऊन करंडकच जिंकला. तो घाटावरच्या कळकट हॉटेलातली चटकदार मिसळ तन्मयतेने खायचा. पूरग्रस्तांच्या मदतफेरीत झोळी घेऊन फिरायचा. गावच्या शाळेसाठीच्या श्रमदानात खरोखरी श्रमायचा. कृष्णा नदीच्या उत्सवात मनसोक्त ढोल बडवायचा.

नदीकाठी घाटावर आम्ही गप्पा ठोकत बसायचो. त्याच्या अफगाण वंशाचा त्याला कोण अभिमान! इराणी, दुराणी, सोमनाथ लुटणारा अब्दाली हे माझ्या इतिहासातले खलनायक त्याचे स्फूर्तिदाते होते. कोणी कोणी भारतावर कधी आणि किती वेळा स्वार्या केल्या; कसं, कुठे आणि काय काय लुटलं हे सगळं तो साभिमान बडबडत राहायचा. लढाऊ अफगाण जनता कधीही पारतंत्र्यात पिचली नाही, हेही तो छाती फुगवून सांगायचा. माझा अफगाणिस्तान गांधारी, पठाणी व्याज, काबुलीवाला आणि पानिपतापुरता सीमित. मी आपला त्याच्या फुशारक्या सहन करत बसायचो. भारतातली जातिसंस्था हा तर त्याच्या टीकेचा आवडीचा विषय. शिवाय भ्रष्टाचार, बेशिस्त, अस्वच्छता, निरक्षरता... टीकेला विषय भरपूर होते त्याच्याकडे. खरी-खोटी, रंजित-अतिरंजित टीका. काही वेळा बोचणारी, काही वेळा ओरखडणारी-ओरबाडणारी रक्तरंजित टीका. एके दिवशी मी प्रतिहल्ला करायचं ठरवलं. डायरेक्ट अफगाणी बायकांच्या बुरख्यालाच हात घातला. ही चाल कशी असमानतेची, पुरुषी सत्तेची द्योतक आहे; यामुळे बायकांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन, टी.बी. वगैरे कसा होतो; व्हिटामिन डी कसं कमी पडतं... वगैरे बरंच बरंच बोललो. माझ्या बोलण्याचं त्याला भयंकर आश्चर्य वाटलं. असा काही दृष्टिकोन असू शकतो हे त्याच्या गावीही नव्हतं. त्याच्या मते बुरखा ही स्त्रीच्या सौंदर्याला, वयात येण्याला, मादकतेला, पुरुषांना आव्हान देणार्या हालचालींना दिलेली मोकळीढाकळी, दिलखुलास, लाजवाब दाद होती. ‘तू बुरखा घाल बये, नाही तर झालोच आम्ही घायाळ’, असं सांगणं होतं. तुझ्या नखाचं दर्शनही आम्हाला विव्हल करतं, असं दर्शवणं होतं. बुरखा ही अभिमानाने मिरवायची चीज आहे, स्त्रीत्वाचं लेणं आहे ते, असं म्हणत सय्यदने मी चांगला टराटरा फाडलेला बुरखा पुन्हा झटक्यात शिवून टाकला होता.

हळूहळू कॉलेजमध्ये सय्यद समरसून गेला. लायनी मारण्यापर्यंत त्याची प्रगती झाली. कॉलेज ऑर्केस्ट्रॉच्या वेळी एक मुलगी त्याला अगदी बिलगून बसली होती. ती घारी, गोरी अप्सरा त्याच्या मनात भरली होती. त्याला छेडलं तर चक्क लाजला वगैरे. मी म्हटलं, “अवघड आहे सय्यद तुझं. तिचं घराणं कडक धर्मनिष्ठ वगैरे आहे.” म्हणतो कसा, “मला फक्त मजा करायची आहे, आणि तिलाही!”

मात्र, सय्यद ऑड बॅचला गेला आणि वाहवत, बहकत गेला. अभ्यासाची संगत सुटली. नवे छंद जडले, नवे फंद पडले. ‘क्रॉनिक’ (वारंवार नापास) मुलांबरोबर राहून राहून त्याला यात काही गैर वाटेनासं झालं. पण पुढे हेही ग्रहण सुटलं. आपल्या बरोबरीची मुलं आपल्या बरीच पुढे गेलेली पाहून त्याला शरम वाटू लागली. त्याने मग नेटाने अभ्यास सुरू केला.

दरम्यान त्याच्या वडिलांची नियमित पत्रं येऊ लागली. ते आता फ्रान्समध्ये होते. कुठल्या तरी संस्थेत प्राध्यापकी करत होते. बहीणही तिथेच होती. पण इतकं सगळं होऊनही सय्यदची आणि कुटुंबीयांची भेट होऊ शकत नव्हती. याचा पासपोर्ट अफगाणिस्तानच्या पदच्युत सरकारने दिलेला. त्या सरकारला युरोपीय देशांची मान्यता नव्हती. आताच्या सरकारचा पासपोर्ट त्याच्याकडे कुठून येणार? असा काहीसा तो तिढा होता. अखेर त्याच्या वडिलांनी बराच काळ बराच पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावला. फायनलची परीक्षा पास होताच सय्यद सार्या कुटुंबीयांना भेटायला फ्रान्सला रवाना झाला. त्याच्याइतकाच आनंद आम्हा मित्रांनाही झाला.

सय्यद आता इंग्लंडमध्ये आहे. एका खेड्यात प्रॅक्टिस करतो. आई-वडील फ्रान्समध्ये होते, पण तिथलं वातावरण अफगाणांसाठी चांगलं नाही, त्यामुळे आता सय्यदच्या आजोळी इराणला आहेत. बहिणीने आता एका नायजेरियन व्यापार्याशी लग्न केलं आहे. ती मेक्सिकोत असते. सय्यदची बायको मूळची ऑस्ट्रेलियन. सुदानमध्ये लहानाची मोठी झाली. त्याला ती फ्रान्समध्ये भेटली. सय्यदला दोन गोजिरवाणी पोरं आहेत. तो आणि मुलं मॅन्चेस्टर युनायटेडचे पक्के फॅन आहेत. एकही मॅच चुकवत नाहीत. सारे मला फेसबुकवर भेटतात.

सय्यद कधी तरी कॉलेजच्या गेट-टुगेदरला येईन म्हणतो, काबुललाही जाईन म्हणतो. शिवाय इराणला आजोळी, ऑस्ट्रेलियाला सासरी, मेक्सिकोला भाच्यांना भेटायला...असं कुठे कुठे जायचं असतं त्याला... कुठे कुठे जातो आणि माझ्याकडे कधी येतो ते बघायचं. माझ्या गावीही यायचं असतं त्याला, पुन्हा नदीकाठी गप्पा मारायला.

तो आला की संध्याकाळी आम्ही घाटावर जाऊ. नदीत पाय सोडून मनसोक्त गप्पा छाटू. मायदेशातून, स्वतःच्या गावातून परांगदा झालेल्या सय्यदला नदीने माझं गाव बहाल केलं असेल. कारण माझी खात्री आहे, सय्यद केव्हाही माझ्याकडे आला, तरी निघताना त्याने मुलांना सांगितलं असेल, ‘गाव्वी ज्वावून यतो!’

डॉ. शंतनू अभ्यंकर

shantanusabhyankar@hotmail.com

 

(डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्याफादर टेरेसा आणि इतर वल्लीयासमकालीनप्रकाशित पुस्तकातील लेख)

 डॉ. शंतनू अभ्यंकर वाईस्थित स्त्रीआरोग्यतज्ज्ञ आहेत. वाचन आणि लिखाण यात त्यांना विशेष रस असून तेअनुभवचे सहयोगी संपादक आहेत.


**********************************************

आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना

• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://imojo.in/anubhav

• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik/pdf-3a78e/

PDF अंक वार्षिक - ₹ ४००
अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।

• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - 9922433614

टिप्पण्या

  1. फारच निराळं,चटका लावणारी खरी गोष्ट! आपण किती सुरक्षित आयुष्य जगतो याचा साक्षात्कार होतो.

    उत्तर द्याहटवा
  2. अशीही आयुष्ये आहेत... व जगणारे ती जिंदादिलीने जगतात हे वाचून कंठ दाटतो.. स्वआयुष्यातील व्यथा कस्पटासमान वाटू लागतात... वाटतं... या जगण्यावर शतदा प्रेम करावे !! .. डॉक्टरांची लेखनशैली अफलातून आहे.. शतशः धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी